Wednesday 6 April 2011

हनुमानची महिमा

Hanumana Bhakti
हनुमानजी रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून. हनुमानजी रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. हनुमानजीचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने मारून फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.
पुढे राम वनवासात फिरत असताना त्याच्याशी हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला.

Monday 7 February 2011

सरस्वती-स्तोत्र

जय जय जननी देवि । जय जय भगवति शारदे ।
नमूं तुला मी केवि । वानूं कवण्या वाणिनें ॥ १ ॥

अनंतगत तूं स्फूर्ति, मूल शक्ति, जय अंबिके ।
तूं सच्चित्सुखमूर्ति, जगीं असज्जडदुःखिं या ॥ २ ॥

पापघटीं निष्पाप, अमंगलीं मांगल्यखनि ।
त्रिविध घोर भवताप, त्यांत सुधाकर शीतला ॥ ३ ॥

मूर्त सत्य तूं देवि; असत्यमय संसारिं या
पंकीं पंकज जेवि कोळशांमध्यें कीं हिरा ॥ ४ ॥

कुरूपतामय भूमी, असौंदर्यि सौंदर्य तूं ।
स्फुलिंग ज्यापरि धूमिं काष्ठगर्भगत ज्योति कीं ॥ ५ ॥

सोरठा एकीकृत सवेंद्रियीं देवि, तुला प्रणिपात ।
दुरित दूर करिं माउली ज्ञात तसें अज्ञात ॥ ६ ॥

दोहा
ध्यानावस्थित करुनि मनाला स्थितप्रज्ञ मुनि शोधिति ज्याला।
तयांहि ज्याचा लेश कळेना, वेदांला जो देवि, वळेना, ॥ ७ ॥

तया अ-जाला घालुनि जन्मा, कोण अकर्म्या जुंपी कर्मा ।
निराकार गे अगुण अनंता कुणीं कोंडिलें त्या भगवंता ॥ ८ ॥

सगुण मूर्त त्या सांत करोनी, नाचविलें गे सलील कोणी ।
वाल्मीकिमनीं करुनि विलासा खेळवोनी निज बाळा व्यासा ॥ ९ ॥

कोण सोडवुनि अढळ पदाला, लोळवि त्याला तुझ्या पदाला ।
तुझ्या कटाक्षा कोण निवारी आली नाचत खाली स्वारी ॥ १० ॥

महालांतुनी खोपट्यांतुनी नगरांमधुनी कीं रानींवनिं, रावांसंगें, रंकांसंगे, गोपांसंगें कृषकांसंगें ।
पापी दुःखी भूवरि ओढुनि नाचविलें त्या दुसर्‍या कोणीं ॥ १२ ॥

दोहा
अतर्क्य महिमा असूनिही भूवरि तुझा निवास ।
दुःखी पापी जनमनीं सुखमय पुण्यविलास ॥ १३ ॥

पादाकुलक अनंत माझीं असतिल पापें, परि ह्रदयस्थे, अघ तुज कांपे ।
कोण अन्यथा ह्रदयीं पापी मंगलमय मधु सुर आलापी ॥ १४ ॥

भेसुर भरल्या मनिं किंकाळ्या त्यांतुनि रागिणि केवि निघाल्या ।
अशिव अभद्रें भरलों आई, विटाळलिस परि त्यांहीं नाहीं ॥ १५ ॥

अति विरूप अति कृष्ण मनीं या पुण्य रम्यता गे कुठुनीया ।
अतिलंपट मी स्वार्थी कामी शुभ शृंगारा गाइन का मी ॥ १६ ॥

पुतळा केवळ मी अनृताचा कशी सत्यमय येइल वाचा ।
खोटी लज्जा, हसणें खोटें, खोटी भीती, रुसणें खोटें, ॥ १७ ॥

हे मम चाळे, मर्कट-चेष्टा, पोटासाठीं हाल-अपेष्टा ।
धनिकलोचनां बघुनि रहावें, श्वानकाकसें जीवित जावें ॥ १८ ॥

निःस्पृहतेची केवळ खाणी कशी निघावी निर्भय वाणी ।
हीन दीन अतिमंद असा मी गाणीं माझीं म्हणूं कसा मी ॥ १९ ॥

नाहिं नाहीं माझी वाणी, आइ, सरस्वति, तव हीं गाणीं ॥ २० ॥

जाति वल्लभा छलछद्ममय भूवरि न करिशी देवि, जरि संचार गे
या त्रिविध तापें दग्ध मनुजां कोण मग आधार गे ।
जगिं कोण रोधि तुझ्या प्रवाहा । वेग तव अनिवार गे ।
मग सत्य-शिव-सौंदर्य यांना काय पारावार गे ॥ २१ ॥

अनंतास आकळी कसा सांतेंद्रियगण सांग।
नमस्कार माझा तुला सरस्वती साष्टांग ॥ २२ ॥

ऊर भरे; दृष्टी झरे, फेडुं कसे उपकार ।
भास्कर करिशी काजव्या, तुझ्या दयेस न पार॥ २३ ॥